आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पालखी सोहळा प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वर्षी निर्मलवारी उपक्रम प्रभावीपणे राबविला असून यंदाचीही वारी सर्वांच्या सहकार्याने आणि पांडुरंगाच्या आशिर्वादाने यशस्वीपणे पार पडेल असे नियोजन करावे. यंदाच्या वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यात आले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी मोठ्या प्रमाणावर जर्मन हँगर उभारण्यात आले असून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच इतर पालख्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पुणे विभागाबाहेरील पालख्यांनाही सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांची नोडल पालकमंत्री व पुणे विभागीय आयुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. डीजे मुक्त वारी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांशी चर्चा करून प्रयत्न करावेत. वारी सोहळा हा पारंपरिक पद्धतीनेच साजरा करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.केले.
–


