शुक्रवारी शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. शहरातील भाजी मार्केट परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची व भाजीविक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली होती. येथील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानातील सामान साहित्य वाचविण्यासाठी दुकानदारांची मोठी धावपळ उडाली होती.
यावेळी पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचणार नाही असा दावा नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात महापौर नारायण चौधरी यांनी केला होता. मात्र सुरुवातीच्या पावसातच शहरातील भाजी मार्केट परिसरासह इतर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने मनपाने कोट्यावधी रुपये खर्च करून केलेला नाले सफाईचा दावा फोल ठरला आहे.


