आमदार संजय केळकर यांनी अधिकारी-ग्राहकांमध्ये घडवला सुसंवाद
स्मार्ट मीटर लावताना वीजग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येईल, त्यांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता श्री. काकडे यांनी दिली. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित अधिकारी, ग्राहक आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित ११५ वा जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी स्मार्ट वीज मीटरबाबत वाढत असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी संयुक्त बैठक घेतली. यावेळी वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. काकडे, विविध विभागातील ग्राहकांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी श्री. केळकर यांनी ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम, त्यांच्या समस्या मांडल्या. तक्रारींचे फोन उचलले जात नाहीत, त्यांच्या तक्रारींचे १०० टक्के निरसन करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. स्मार्ट मीटर लावताना ग्राहकांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत तक्रारी आणि त्यावरील उपाययोजना यावर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी बोलताना श्री. काकडे यांनी सांगितले, कायद्याच्या तरतुदीनुसार स्मार्ट मीटर लावण्यात येत असून ग्राहकांशी संवाद न साधता मीटर लावण्यात येणार नाहीत. ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी एखाद्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावताना तेथे २०टक्के मीटर जुनेच ठेवण्यात येतील, जेणेकरून नवीन आणि जुन्या मिटरमधील फरक कळून येईल. शासनाने सकाळी ९ ते ५ या काळात वीजवापर करणाऱ्या ग्राहकांना ८५ पैसे सुटही देण्यात आल्याची माहिती श्री. काकडे यांनी दिली.
पाच लाखांपर्यंत झालेल्या सायबर गुन्ह्यांत तातडीने निराकरण करण्याचे पत्रक पंतप्रधान कार्यालयाने काढले असून अशा प्रकरणात पीडितांना लवकर न्याय मिळू शकणार आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना श्री. केळकर यांनी दिली. महापालिकेतील कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असून याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून किमान वेतन, विमा आदींबाबत दोन आठवड्यात आढावा घेऊन दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कामगार उपायुक्तांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना केल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.


