ठाणे – कल्याण मुरबाड मार्गावरील वाढती प्रवासी संख्या पाहता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मार्गावर एसटीच्या फेऱ्यांची वाढ करण्याचा निर्णय प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा ठरल्याचे एसटीच्या आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. अपुऱ्या एसटी सेवेमुळे अनेक प्रवासी नाईलाजाने अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घेत होते. मध्यंतरी या रोडवर भीषण अपघाता ही झाला होता, या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी स्वतः लक्ष घालून या मार्गावरील एसटी फेऱ्या तातडीने वाढविण्याचे निर्देश दिले.
कल्याण – मुरबाड मार्गावरील फेऱ्यांची संख्या
४८ वरून थेट १०८ करण्यात आल्यामुळे प्रवासी संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेसही सेवेत दाखल करण्यात आल्या असून, त्यालाही नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.


