शाळेच्या पहिल्या दोन तासांमध्ये वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम पार पडले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘झाडे आपले मित्र’ या विषयावर चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘झाडे वाचवा – पृथ्वी वाचवा’ या विषयावर आकर्षक पोस्टर्स तयार करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात वृक्षारोपण करून रोपांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. तर इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्लांट पॉट डेकोरेशन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सजविलेल्या कुंड्यांद्वारे हरित जीवनशैलीचा संदेश दिला.
आज वाढते प्रदूषण, हवामान बदल, तापमानवाढ आणि झपाट्याने कमी होत चाललेले हरित क्षेत्र ही संपूर्ण जगासमोरील गंभीर आव्हाने आहेत. अशा
परिस्थितीत पर्यावरण संवर्धनाची जाणीव बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचे कार्य शाळांनी हाती घेणे ही काळाची गरज असल्याचे पी इ एस टी सोसायटीचे कार्यवाह आल्हाद जोशी यांनी सांगितले.
वनमहोत्सव सप्ताहाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ, हरित भारत घडविण्यासाठी सक्रिय योगदान देण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता समाजापर्यंत पोहोचावा, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


