गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा किंचित कमी
ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या बारवी धरणातील पाणी पातळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किंचित घट झाली आहे. आज, २५ मे रोजीच्या आकडेवारीनुसार, धरणात सध्या ६०.७९ मीटर पाणी पातळी असून १०९.५१ दलघमी (३२.३१ टक्के) थेट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी धरणामध्ये ६०.८८ मीटर पाणी पातळीसह ११०.७० दलघमी म्हणजेच ३२.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. ही आकडेवारी पाहता गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा किंचित कमी झाला असून, बदलत्या हवामानामुळे आगामी काळात पाणी चिंता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पाणी कपातीमागे आणि पातळी खालावण्यामागे गेल्या वर्षीच्या तुलनेत हवामानात झालेला मोठा बदल कारणीभूत ठरला आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच २०२५ मध्ये १३ मे पासूनच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मे महिन्याच्या मध्यावरच पाऊस सुरू झाल्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली होती आणि पाणी पातळी वाढण्यास मदत झाली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी १३ मे नंतर आकाश ढगाळ राहिल्याने आणि पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन पूर्णपणे थांबले होते. याउलट, यंदा मे महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. कडक उन्हाचा मारा थेट धरणातील साठ्यावर होत असल्यामुळे पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे आणि त्यामुळे पाणी पातळी झपाट्याने खाली जात आहे.
या परिस्थितीला जागतिक हवामान बदलाचा आणि यंदा प्रकर्षाने जाणवणाऱ्या “एल निनो “चा प्रभावही कारणीभूत आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा एल निनो सक्रिय झाल्यामुळे मान्सूनच्या आगमनावर आणि त्याच्या तीव्रतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १३ मे रोजीच निसर्गाने पावसाच्या रूपाने दिलासा दिला होता, मात्र यंदा मे अखेर आली तरी कोरडे आणि उष्ण वातावरण कायम आहे. पावसाचे दिवस कमी होणे, उन्हाची तीव्रता वाढणे आणि एल निनोच्या सावटामुळे मुख्य मान्सून लांबण्याची भीती यामुळे हा शिल्लक साठा आणखी काही दिवस पुरवावा लागणार आहे. सध्या धरणात ३२ टक्क्यांहून अधिक साठा असला, तरी आगामी काळातील अनिश्चितता पाहता प्रशासनासह नागरिकांनीही आतापासूनच पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करणे गरजेचे बनले आहे.


