कल्याण शहरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा बाजारपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. २८ एप्रिल २०२६ रोजी सपोनि प्रशांत आंधळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गु.र.क्र. १३६/२०२६ मधील चोरीची अॅक्टिव्हा एम एच-०५/सीआर/१११५ घेऊन आरोपी समर्थ नरसु पाटील सम्राट अशोक चौकात उभा आहे.
वरिष्ठ पो. निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून समर्थ पाटील, वय वर्ष १९ याला चोरीच्या गाडीसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इतर ३ साथीदारांसह मागील एक महिन्यात कल्याण शहरातून विविध दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
आरोपींच्या चौकशीतून बाजारपेठ पोलीस ठाण्यातील ५, महात्मा फुले पोलीस ठाण्यातील १ व खडकपाडा पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ७गुन्हे उघडकीस आले. सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) नुसार दाखल आहेत.
पोलिसांनी होंडा अॅक्टिव्हा, टीव्हीएस एनटॉर्क, सुझुकी अॅक्सेस व बर्गमन अशा वेगवेगळ्या कंपनीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त गाड्यांची एकूण किंमत ₹ २८०,०००/- आहे.
सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सुरेशसिंग गौड, पो. निरीक्षक डुकळे, सपोनि प्रशांत आंधळे, पो. हवा. पाटील, भालेराव, बागुल, बाविस्कर, पो.शि. आंधळे, ईशी यांच्या पथकाने केली.



