राष्ट्रीय डेंग्यू दिवस हा एकप्रकारे आपणच आपल्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचा दिवस असून नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवून कुठेही पाणी जमा झाल्याने व उघडे राहिल्याने त्यामध्ये डासांच्या आळ्या निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त गावदेवी मैदान कुकशेत गाव येथून सुरू झालेल्या हिवताप व डेंग्यू प्रतिबंधात्मक दिंडी उपक्रमाचा शुभारंभ महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, ब प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. रूपाली भगत, नगरसेविका श्रीम. स्वप्ना गावडे, श्रीम.मिरा पाटील, श्रीम. प्रिती भोपी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण तसेच वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभागातील 800 हून अधिक अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक यांच्या एकत्रित सहभागातून यशस्वीरित्या संपन्न झालेल्या या जनजागृती दिंडी उपक्रमाचा आरंभ महापौर महोदयांच्या हस्ते हिवताप-डेंग्यू आजार कशामुळे होतो याचे आकर्षक मॉडेल्स मांडलेल्या चित्ररथावरील पडदा दूर करून झाला.
या चित्ररथावर डास उत्पत्तीची ठिकाणे थ्रीडी मॉडेल्सव्दारे दर्शविण्यात आलेली होती. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग विविध माध्यमांतून जनजागृती करतो, डास प्रतिबंधात्मक वेगवेगळ्या प्रकारची कार्यवाही करतो, मात्र नागरिकांनी आजार झाल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक काळजी घेणे जास्त महत्वाचे असल्याचे सांगत महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी एखादा रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या आसपासच्या 100 मीटर परिसरात आरोग्य विभाग तपासणी करतो त्यावेळी नागरिकांनी आपल्या भागात आजार पसरू नये याकरिता डास उत्पत्ती स्थानांच्या शोध मोहीमेसाठी व त्यांचा नाश करण्यासाठी घरी, कार्यालयात येणा-या महापालिका कर्मचा-यांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी बोलताना आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी, राष्ट्रीय दिनाचे घोषवाक्य – ‘डेंग्यू नियंत्रणासाठी जनसहभागः चेक, क्लिन आणि कव्हर’ हे असून ‘चेक’ म्हणजे घरात आणि घराभोवताली पाण्याचे साठे उघडे आहेत का ते तपासा, ‘क्लिन’ म्हणजे तपासून स्वच्छ करा आणि ‘कव्हर’ म्हणजे पाणी साठवणुकीची ड्रम, टाक्या अशी साधने झाकून ठेवा अशी त्रिसूत्री अंगिकारावी असे नागरिकांना आवाहन केले.
आरोग्य विभागातील डॉक्टर्सपासून आशा वर्कर्सपर्यंत 800 हून अधिक अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांसह मोठ्या संख्येने एकत्र येऊन दिंडी उपक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले. पावसाळी कालावधीत उघड्यावर पडलेल्या टाकाऊ वस्तू, गच्चीवरील टायर्स अशा ठिकाणी पाणी साचते आणि त्यात डास होतात आणि हिवताप, डेंग्यूचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून पाणी साचून राहणार नाही व त्यात डास अळ्या होणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच हिवताप, डेंग्यूचा रूग्ण घरात, परिसरात आढळल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी केले.
-सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली आयोजित या भव्यतम दिंडी उपक्रमाचे आयोजन अत्यंत दिमाखदार पध्दतीने नेटकेपणाने करण्यात आले होते. हिवताप, डेंग्यू प्रतिबंधात्मक घोषवाक्यांच्या घोषणा देत, दिंड्या पताका नाचवित, टाळ मृदुंगाचा गजर करीत, पारंपारिक वारकरी पोषाखात नटलेले महिला व पुरूष अधिकारी कर्मचारी, नागरिक सहभागी असलेल्या या जनजागृतीपर दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये म्हणण्यात आलेले हिवताप-डेंग्यूविषयी जनजागृती करणारे अभंग हे नमुंमपा कर्मचारी कवी श्री. वसंत निमसे यांनी रचलेले होते तसेच त्याचे चाल लावून गायन श्री. गणेश देशमुख यांनी केले. दिंडीत सहभागी झालेल्या कर्मचा-यांना देण्यात आलेल्या कुपनचा लकी ड्रॉ काढून राजश्री जगदाळे, प्रवीण ठाकूर व अरूण मलपेकर या कर्मचा-यांना स्नेहभेट प्रदान करण्यात आली.


