भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव नेतृत्व आहे. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरीवर्ग पूर्ण ताकदीनिशी देवाभाऊ सरकारच्या पाठीशी उभे आहे’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी केले.
पीक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भाजप किसान मोर्चाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी रविंद्र चव्हाण यांनी सभागृहाला संबोधित केले.
शेतरस्ते आणि पाणंद रस्ते, जलयुक्त शिवार अभियान, शेतीला मिळालेली AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड, कृषी पंपांना भर दिवसा मोफत वीज अशा फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या विविध निर्णय आणि योजनांचा यावेळी श्री. रविंद्र चव्हाण यांनी मागोवा घेतला. सरकारच्या कामगिरीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यादरम्यान भाजप प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे यांनी राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून आणि देवाभाऊ यांच्या नावाने जयघोष केला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याकडे केवळ एक सत्कार सोहळा म्हणून न पाहता शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी म्हणून पाहत असल्याचे नमूद केले. तसेच ‘कोणतीही राजकीय निवडणूक डोळ्यांसमोर नसताना आम्ही कर्जमुक्तीचा निर्णय घेतला, कारण शेतकऱ्यांचे हित हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. अनेकांना वाटत होतं सरकार कर्जमाफी करणार नाही. आपण आंदोलने करू, पण हे महायुतीचे सरकार आहे, शेतकऱ्यांच्या देवाभाऊचे सरकार आहे’ असंही ते म्हणाले.
७.५ अश्वशक्ती क्षमतेच्या कृषी पंपांना भर दिवसा आणि मोफत वीज देण्यात येत आहे. या पंपांसाठी असणारे ४८ हजार कोटींचे जुने वीज बिल माफ करत असल्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली.


